विंचूर गावच्या इंदिरानगर भागात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास पत्रा शेडच्या घराला आग लागल्यानंतर
घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर आग भडकल्याने
३ घरे जळून खाक झाली. घरातील यामध्ये संसारोपयोगी साहित्य, धान्य, रोख रक्कम व सोने जळून खाक झाल्याने १४ ते १५ लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील सर्वजण शेती कामाला गेल्याने दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

विंचूर येथील ग्रामपंचायत सदस्या सरुबाई देवकते यांच्या राहत्या घरात अचानक आग लागली. ही आग पसरल्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरला आणि घरात आग भडकली.
काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत सरुबाई देवकते व त्यांची दोन्ही मुले महासिद्ध व बिल्यानसिद्ध देवकते यांची घरे जळून खाक झाली , तिघांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेजारील अंबाण्णा कोळी यांच्या घरालाही आगीची झळ लागल्याने नुकसान झाले.
देवकते यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. तलाठी सतीश भंडारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.

या दुर्घटनेत सरुबाई देवकते यांचे पाच लाख, महासिध्द देवकते यांचे साडे चार लाख तर बिळ्याणसिध्द देवकते यांचे चार लाख ८० हजाराचे नुकसान झाल्याचे तलाठी भंडारे यांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राज डांगे यांनी पोलिस हवालदार दावणे, पोलिस शिपाई शिवणे व होमगार्ड जवानांसह
घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाडीची वाट न पाहता पोलिस उपनिरीक्षक डांगे व पोलिसांनी गॅसचा स्फोट झाल्याने घाबरलेल्या ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर पोलिस अधिकारी व ग्रामस्थांनी घागरी व बादलीने पाणी मारून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळात भंडारकवठाच्या लोकमंगल साखर कारखान्याची अग्निशामक गाडी आली. त्यामुळे आग आटोक्यात आली. मात्र, परिसरात अनेक पत्राशेड व झोपडीची घरे होती. आग भडकण्याच्या शक्यतेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.



